Tuesday, January 12, 2016

******* भारतीय वर्णमाला, भाषा, राष्ट्र आणि संगणक

 भारतीय वर्णमाला, भाषा, राष्ट्र आणि संगणक 
भारतीय भाषा, भारतीय लिप्या असे शब्दप्रयोग आपण खूपदा ऐकलेले असतात, व्यवहारातही आपण वापरतो. पण भारतीय वर्णमाला ही संकल्पना आपल्याला फारशी माहीत नसते. शाळेच्या पहिल्या वर्गात अक्षर ओळख शिकवण्यासाठी जो तक्ता वापरतात त्यावर वर्णमाला हा शब्द असतो. तसेच तो पहिलीच्या पाठ्यपुस्तकातही असतो. ज्या कुणाचा पहिलीच्या वर्गाशी संबंध येत नाही, त्यांना त्या शब्दाचाही विसर पडलेला असतो. त्यामुळे त्यामागील संकल्पना ही तर खूप लांबची गोष्ट. 


म्हणूनच सर्वप्रथम वर्णमाला या संकल्पनेची ओळख करून द्यायला हवी. भारतीय वर्णमाला ही दक्षिणेकडील सिंहली भाषेपासून तर सर्व भारतीय भाषा तसेच तिबेटी, नेपाळी, ब्रम्हदेशी (थाय भाषा) इंडोनेशिया, मलेशिया पर्यंत सर्व भाषांची वर्णमाला आहे. त्यांच्या लिप्या जरी वेगवेगळ्या वाटत असल्या तरी सर्वाना देवनागरी हे सरसकट संबोधन लागू पडते. अतिपूर्वेकडील चीन, जपान व कोरिया या तीन देशात चीनी वर्णमाला वापरली जाते. तमाम मुस्लीम देशांमध्ये फारशी वर्णमाला वापरली जाते तर युरोप व सर्व अमेरीकन भाषांना ग्रीको-रोमन-लॅटीन वर्णमाला असून त्या त्या भाषेपरत्वे वर्णाक्षरांची संख्या कधी २६ (इंग्रजी भाषेसाठी) तर कधी २९ (ग्रीकसाठी) अशी कमी जास्त होत असते.

मानवाची उत्क्रांती होऊन माणूस बोलू लागला आणि शब्दाची उत्पत्ति झाली. तसे पाहिले तर चिमण्या, कावळे, गाय, बकरी, भुंगे, माशी हे प्राणी देखील ध्वनी उच्चारण करतातच, पण माणसाच्या मनांत शब्द ही संकल्पना आली. अशा प्रकारे नादब्रह्म म्हणजे ॐकार व त्यानंतर शब्दब्रह्म प्रकटले. पुढे मनुष्य चित्रलिपी शिकला व गुहांमधुन चित्रे कोरून त्यामार्फत संवादाला व ज्ञानाला स्थायी स्वरूप देऊ लागला. त्यातून अक्षराची संकल्पना आली. अक्षरचिन्हे निर्माण झाली आणि वर्णमाला अवतरली.

भारतीय मनीषींनी ओळखले की वर्णमालेमध्ये विज्ञान आहे. ध्वनी उच्चारणात शरीरातील विभिन्न अवयवांचे व्यवहार होतात. त्या शरीर-विज्ञानानुसार भारतीय वर्णमाला तयार केली गेली व तिची वर्गवारीही झाली. अशा प्रकारे स्वर व व्यंजन अशी वर्गवारी झाली. व्यंजनांमध्येही कण्ठवर्ग - त्यातील पाच व्यंजने, तालव्य वर्ग, मूर्धन्य स्वरांचा वर्ग, दंत स्वर, ओष्ठ स्वर इत्यादी सखोल अभ्यासातून वर्णमालेचा क्रम निश्चित झाला. कखगघङ ही अक्षरे एका क्रमाने उच्चारताना शरीराला वापरावी लागणारी ऊर्जा कमी खर्च होते. जगातील इतर तीनही वर्णमालांचा शरीरशास्त्राशी अगर उच्चारणशास्त्राशी काहीही संबंध नाही. व्यंजनामध्ये पुन्हा महाप्राण आणि अल्पप्राण असे भेद झाले. मुख्य म्हणजे ध्वनी उच्चारणातीलमंत्रशक्ती असा एक वेगळा विषय व त्याचा अभ्यास सुरू झाला. शरीरशास्त्राच्या अभ्यासातून कुंडलिनी, षट्चक्र, ब्रह्मरंध्र, समाधीतून विश्वाशी एकात्मता, सर्वज्ञता, या संकल्पना पुढे आल्या. आणिमा, गरिमा, लघिमा, इत्यादी सिद्धी प्राप्त करता येऊ शकतात, याचे ज्ञान भारतीय मनीषींना झाले. षट्चक्रांमध्ये पाकळ्या असून प्रत्येक पाकळीवर एकेक अक्षर (स्वर अथवा व्यंजन) आहे आणि त्या त्या अक्षरावर ध्यान केंद्रित करून एकेक पाकळी व एकेक चक्र सिद्ध करता येते (साधता येते) अशी आपल्याकडे संकल्पना आहे. म्हणूनच अमंत्रं अक्षरम् नास्ति- ज्यात मंत्रशक्ती नाही असे कोणतेही अक्षर नाही असे सांगितले आहे.

अशा प्रकारे आपल्या वर्णमालेत वैज्ञानिकता सामावलेली आहे, विज्ञान-विचार झालेला आहे आणि हा वारसा आपल्याला नक्कीच अभिमानास्पद आहे.

ज्ञानाची प्रगती आणि विस्तार होत असताना- त्यातून समाजाची प्रगती, अभ्युदय आणि समृद्धी होत असतात. याची दुसरी बाजू म्हणजे समाजातील विभिन्न घटकांच्या व त्यांच्यातील कौशल्याच्या आधाराने ज्ञानविस्तार होत असतो. असे ज्ञानविस्तार आणि एकसंध समाज हे एकमेकांना पूरक असतात. एखादे ज्ञान समाजाच्या सर्व थरापर्यंत किती लवकर झिरपते त्यावरून तो समाज एकत्र पुढे जाईल की नाही हे ठरते. एकत्र पुढे जाण्यासाठी काही समाजमूल्ये रूजवावी लागतात. सत्यं वद, धर्मम् चर, अतिथी देवो भव, चरेवैति-चरेवैति, अशी काही भारतीय समाजमूल्ये सांगता येतील. पण फक्त नीतितत्व एवढेच समाजमूल्य नसते तर ज्ञानाचा वापर कसा झाला- त्यातून तंत्र व यंत्र कशी निर्माण झाली- ती देखील समाजात कशी रूजली हे ही महत्वाचे असते. दुधातुन ठराविक प्रकारे विरजण लावून दही करता येते, त्यातून मंथनातून लोणी निघते व त्याची अग्नीच्या सहाय्याने मोठी प्रक्रिया करून तूप निघते हे तीन टप्प्यातील ज्ञान समाजात घरोघरी पोहचवून, त्याप्रमाणे घराघरात प्राविण्य निर्माण करणे सोपे नसते. समाजमूल्य व तंत्रज्ञान सामुहिक आणि सार्वजनिक होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अतोनात श्रम घेतले. सहनाववतु, सहनौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै हा शांतीमंत्र, ही प्रार्थना कित्येक ग्रंथामध्ये आली आहे ती उगीचच नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये राष्ट्र ही संकल्पना समाजकारणावर आधारित होती - राजकारणावर नाही. एक राजा, त्याची प्रजा (म्हणजे कर भरणारे लोक), त्याचे राज्य, तेही सैन्यशक्तीवार आधारित – असे असेल तरच ते राष्ट्र ही राष्ट्राची संकल्पना युरोपीय देशांकडून आली. म्हणूनच ते आपल्याला हेटाळणी करुन विचारतात- कधी, कुठे होता तुमचा भारत देश -- तो तर आम्ही तुम्हाला दिला. या हेटाळणीने आपण न्यूनगंडात पडतो. आपल्या ग्रंथाचा शोध घेऊ लागतो. कुठेच भारत देश आणि त्याच्या भौगोलिक सीमा जुन्या ग्रंथात सापडत नाहीत म्हणून हळहळतो आणि युरोपियन विद्वानांपुढे आत्मग्लानीने वागतो. त्याचे कारण आपण त्यांची परिभाषा मान्य केलेली असते. ती मान्य केली कारण आपली परिभाषा काय होती - त्यामागची विचारप्रणाली काय होती याचा आपण अभ्यास केलेला नसतो. तो केलेला असेल तर आपल्याला हे ठासून सांगता येते की जिथपर्यंत हा आमचा एकसंध समाज होता, समान तंत्रज्ञान, वर्णमाला, संस्कृती आणि समाजमूल्ये असणारा हा समाज होता तिथपर्यंत भारत हे राष्ट्र होते. ते भूगोल आणि सैन्यशक्तीवर आधारित नसून मंत्रशक्ती, ज्ञानप्रसार आणि नीतिमूल्यांवर आधारित होते. असो हे विषयांतर झाले.

मूळ मुद्दा आहे वर्णमालेचा. भारत देशांत हजारो वर्षांच्या वापरामुळे वर्णमालेचे विभिन्न आयाम प्रकटले. ती लोककलांसाठी देखील एक विषय बनली. वर्ण या शब्दाचा अर्थ रंगछटा असाही आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे षट्चक्रांमध्ये जी अक्षरे आहेत त्यांना त्या-त्या चक्राचे रंग देखील जोडले आहेत. थोडक्यात आपल्या वर्णमालेचा वापर हा केवळ लिहिण्यापुरता मर्यादित नसून जीवनाच्या इतरही कित्येक अंगामध्ये हे ज्ञान गुंफलेले आहे.

वर्णमाला या विषयावर इतके प्रदीर्घ विवेचन करण्याचे कारण आहे. नव्या युगात विकसित झालेले संगणकाचे तंत्रज्ञान आणि वर्णमाला यांचा अन्योन्य संबंध आहे. हे नवे तंत्रज्ञान सर्वदूर वापरात असल्यामुळे त्याचे संख्याबळ अवाढव्य आहे तसेच त्याची भेदक शक्ती देखील प्रचंड आहे. जीवनातील कित्येक सोई किंवा ज्ञान प्रसार दोन्ही बाबत या तंत्रज्ञानाने काही मूलभूत बदल आणले आहेत. एकीकडे आपल्या हजारो वर्षाची परंपरा सांगणारी आणि कित्येक आयामांमधून प्रकट होणारी आपली वर्णमाला आहे. दुसरीकडे पुढला कित्येक शतकांचा भविष्यकाळ घडवणारे हे संगणक तंत्रज्ञान आहे. आता भारतियांनी या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे की हे नवे तंत्रज्ञान आणि आपली वर्णमाला यांची सांगड कशी घालायची. ती सकारात्मक असेल तरच आपली वर्णमाला टिकू शकते, इतकेच नव्हे तर भविष्यात संगणक-तंत्राला समृद्धही करू शकते. या उलट घडले तर आपल्या वर्णमालेला नामशेष करण्याचे सामर्थ्यही संगणक तंत्रज्ञानात आहे हे आपण ओळखले आणि स्वीकारले पाहीजे. वर्णमालेसोबत आपल्या लिप्या आणि भाषासुद्धा नामशेष करण्याचे किंवा सकारात्मक सांगड असेल तर त्यांना समृद्धीच्या नव्या शिखरावर नेण्याचे सामर्थ्य संगणक तंत्रात आहे.

म्हणूनच संगणकाचा विकास कसा झाला याबाबत थोडेसे विवेचन आधी देत आहे.
एकोणिसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जी प्रचंड झेप घेतली त्यातून क्ष-किरणे आणि मेडीकल शास्त्रात उत्क्रांती, अणुविच्छेदन व त्यातून अणुउर्जा निर्मिती, खगोलशास्त्रीय दुर्बिणी, अँटमबाँमचा वापर अशा कित्येक घटना सांगता येतील. त्याच्याही आधीच मेंदुयुक्त यंत्राची कल्पना पुढे आली होती. आधी अगदी साधी बेरीज, गुणाकार, भागाकार करणारी मशिन्स आली. मला आठवतय की १९६८ मध्ये आमच्या भौतिक विज्ञान प्रयोगशाळेत आम्ही असे मशिन वापरत असू आणि काही जणांचा तोंडी गणित करण्याचा वेग त्यापेक्षा जास्त होता म्हणून हसतही असू. पण मोठमोठ्या संख्यांची उलाढाल करताना याचा वेग आणि अचूकता आमच्यापेक्षा चांगली होती हे भानही होते. युरोपिय देशात मात्र ही संकल्पना बरीच पुढे गेलेली होती. यंत्रांशी संवाद करण्यासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लोग्यारीथम्, घात ही चिन्हे पुरेशी नव्हती. तर आपली भाषा संगणकाला समजली पाहीजे व संगणकाने त्याच्या भाषेत प्रश्नाचे उत्तर शोधून पुन्हा ते मानवी भाषेत मानवापर्यंत पोचवले पाहीजे. यासाठी इंग्रजी भाषा वापरली गेली. संगणकाचा प्रारंभिक डोलारा पूर्णपणे इंग्रजी भाषा व इंग्रजी वर्णमालेवर उभा राहिल्यामुळे इतर सर्व भाषांना मागे लोटण्याचे आणि नामशेष करण्याचे सामर्थ्य संगणकात आले. हे ओळखूनच काय की सर्वप्रथम जपानने या बाबतीत पुढाकार घेतला. संगणकामध्ये पडद्यामागील आणि पडद्यावरील व्यवहार असे दोन भेद करता येतात. त्यामुळे पडद्यावरील सर्व व्यवहार जपानी भाषेत व जपानी लिपीतच राहतील याबद्दल ते आग्रही राहिले. पाठोपाठ फ्रान्स, स्वित्झरलॅन्ड, रशिया, जर्मनी याही देशांनी त्यांची थोडीफार वेगळी स्वरचिन्हे, ग्रीक वर्णाक्षरे इत्यादी संगणकाच्या पडद्यावरील व्यवहारात समाविष्ट होतील हे पाहिले. मात्र जपान खेरीज या सर्व देशांची वर्णमाला ग्रीको-रोमन-लॅटिन - म्हणजे इंग्रजी सदृशच होती आणि लिपीमध्ये फरकही फार नव्हते. फार तर कॅलीग्राफी वेगळी होती असे म्हणता येईल. जपानी वर्णमाला आणि लिपी या सर्वांहून नितांत वेगळी होती हे लक्षात घेतले म्हणजे जपान्यांचे कौतुक केल्याशिवाय रहावत नाही. पडद्यावरील व्यवहार इंग्रजीखेरीज इतर भाषांमध्ये असणे हा संगणक इतिहासातील वेगळ्या वाटेचा टप्पा होता. कालांतराने चीनी लिपी, फारसी लिपी याही कॉम्प्लेक्स लिप्या असूनही त्यांनी संगणक क्षेत्रावर मोठी पकड बसवली – भारतीय लिप्या मात्र अजूनही रखडत आहेत.

आता पडद्यामागील व्यवहाराबाबत एकत्रीकरणाची गरज होती त्या मुद्द्याकडे वळू.
मानवी (म्हणजे इंग्रजी) भाषेतील वाक्य, शब्द, अक्षर हे सर्व संगणकाला समजावे यासाठी प्रत्येक अक्षराचे एक संगणकीय चिन्ह किंवा खूण निर्माण करावी लागते. संगणकाला फक्त दोन गोष्टी कळतात- वीज प्रवाह असणे किंवा नसणे. यालाच गणिती भाषेत १ किंवा ० असे मूल्य ठरविण्यात आले. त्यामुळे दशमलव पद्धतीतील सर्व गणितीय मुळांक म्हणजे १ ते ९ आणि शून्य हे सर्व द्विअंशी -- ज्यात फक्त एक आणि शून्य असे दोनच अंक आहेत अशा पद्धतीत बदलता येतात. उदाहरणार्थ ३ हा अकडा ११ असा लिहिणे किंवा ७ हा अकडा १११ आणि १२ हा अकडा ११०० असा लिहिणे. गणिती आकडे अशा प्रकारे लिहून आपल्याला आणि संगणकालाही गणिते करणे कठिण नसते. हे ज्ञान जगभर होतेच. मात्र अक्षरांचे काय? यासाठी पहिल्या महायुद्धात बिनतारी संदेश पाठवण्यासाठी- मोर्सकोड या नावाने अक्षरचिन्हे ठरविण्यात आली होती ते माँडेल डोळ्यासमोर होते. बिनतारी संदेश पाठवताना दुस-या टोकाला छोटा सिग्नल (डिड् असा आवाज) किंवा मोठा सिग्नल (डाssss असा आवाज) पाठवता येतात. मोर्स कोड मध्ये A साठी डिड्-डा असा म्हणजे ०- किंवा S साठी डिड-डिडि-डिड ००० , O साठी डा-डा-डा-अशा प्रकारे सर्व इंग्रजी अक्षरे, विरामचिन्हे आणि दहा आकडे तसेच स्पेस किंवा जागा सोडणे या सर्वासाठी डिड् आणि डा या दोनच ध्वनींच्या सहाय्याने मानवी संदेश पाठवायचे तंत्र विकसित केले गेले होते. त्याच धर्तीवर संगणकावर वापरण्यासाठी प्रत्येक अक्षराची संकेत-श्रृंखला विकसित झाली. त्याचप्रमाणे प्रत्येक अक्षराला त्याच्या संकेतशृंखलेनुसार संगणकाच्या मेमरी मध्ये एक ठराविक जागा बहाल करून तिथे साठवून ठेवता येते व हवे तेव्हा त्याचा प्रिन्टआऊट काढता येतो. मग तो प्रिन्टआऊट सुबक दिसावा व त्याचा आकार लहान मोठा करता यावा या दृष्टीने इंग्रजी लिपीतले वेगवेगळे फाँन्ट्स उपयोगात आणले गेले. उदाहरणार्थ टाईम्स न्यू रोमन, एरीयल, कूरियर इत्यादी. या पैकी काही फाँन्टसेट्स हे आधीपासून प्रकाशनाच्या कामासाठी विकसित केलेले होते, तर काही नव्याने विकसित केले जाऊ लागले. एव्हाना १९६० ते १९७० हे दशक संपले होते. मात्र एक समस्या उरली होती. संगणकावर काम करताना प्रत्येक अक्षराची संकेतश्रृंखला काय असेल आणि संगणकाच्या मेमरीतील जागा कोणती असेल (तांत्रिक भाषेत संगणकाचे स्टोरेज कोड काय असेल) ते त्या त्या संस्थेतील लोकांनाच तयार करावे लागत असे व फक्त त्या संस्थेपुरतेच वापरता येत असे.

अशा काळात संगणकीय काम करणा-या संस्थांनी एकत्र येवून ठरवले की, एकमेकांचे काम एकमेकांना न कळू शकणे हा विकासाच्या मार्गात मोठा अडसर आहे. व तो दूर केलाच पाहीजे. यासाठी प्रत्येक अक्षरासाठी आठ संकेतांची एक अशी संकेतश्रृंखला निश्चित करण्यात आली केली गेली व तिचे स्टॅण्डर्डायझेशन झाले. सर्वाधिक वापरले जाणारे स्टॅण्डर्ड ASCII होय, पण इतरही काही स्टॅण्डर्ड्स विकसित झाली. हे स्टॅडर्डायझेशन एकदा निश्चित झाल्यावर काही संगणक प्रोग्रामर्स सॉफ्टवेअर्स तयार करण्याकडे वळले, त्यांनी शब्दलेखनाचे सॉफ्टवेअर तयार करून ते विकायला सुरूवात केली. हा ही संगणक विकासातला पुढला टप्पा ठरला.
त्या काळात नवे सॉफ्टवेअर लिहीणे हे जिकिरीचे व खर्चाचे काम होते. अशा प्रकारे चार-सहा वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले भाषा लेखन सॉफ्टवेअर बाजारात उतरवले. त्यामुळे नव्याने संगणकीय काम करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा पहिल्या धड्यापासुन सुरूवात न करता अशी उपलब्ध सॉफ्टवेअर्स घेता येऊ लागली. भाषा लेखनाप्रमाणे सारणी लेखनाचीही सॉफ्टवेअर तयार करण्यात आली.

तरीही या सर्व कंपन्यांचे स्टोरेज कोड वेगवेगळे होते. म्हणजे जरी अक्षरश्रृखलाचे स्टॅण्डर्डायझेशन झाले होते तरी संगणकाच्या मेमरी मध्ये त्या अक्षरांची जागा कोणती ते प्रत्येक सॉफ्टवेअरचे गुपित असायचे. पण याने विकास खुंटतच होता. तेव्हा पुन्हा त्या क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन याचेही स्टॅण्डर्डायझेशन केले.

थोडक्यात इंग्रजी भाषेतून काम करणा-या संगणक कंपन्यांनी अशा प्रकारच्या एकत्रीकरणाला मान्यता दिल्यामुळे संगणक ज्ञानाचा विस्तार व प्रसार झाला व विकासाची भरभराट झाली. संगणक क्षेत्रातील उलाढाल ही जगातील मोठ्या उलाढालींपैकी एक ठरली.

भारतीय भाषांचे दुर्दैव असे की, या भाषांमधून सॉफ्टवेअर तयार करणारे लोक इतक्या दशकांनंतर अजूनही आपापल्या वेगळेपणाचा हट्ट सोडायला तयार नाहीत आणि या हट्टामध्ये सर्वात पुढे आहे ती संपूर्णपणे सरकारी खर्चावर म्हणजेच जनतेच्या पैशांवर अवाढव्य पगार घेऊन पोसली जाणारी सी-डॅक हीच यंत्रणा. अत्युत्कृष्ट वैज्ञानिक क्षमता असूनही व त्याआधारे एक अत्युत्कृष्ट प्रणाली निर्माण करूनही देशहित न कळल्याचे हे उदाहरण होते. हा हट्ट त्यांनी दोन प्रकारे जोपासला.

पहिला प्रकार की-बोर्डाबाबतचा. अगदी प्रारंभिक काळात (१९८८)सी-डॅक ने देशी भाषांच्या संगणक वापरासाठी जे काही सॉफ्टवेअर बनवले त्यामध्ये तीन प्रकारांनी की-बोर्ड वापरण्याची सोय होती - हुबेहुब जुन्या टाईपरायटरच्या लेआऊटचा व तसाच क्लिष्ट पण पूर्वापार टायपिंग करणा-या सर्वांना तात्काळ परिचित होणारा, दुसरा इन्स्क्रिप्ट की-बोर्ड जो भारतीय वर्णमालेच्याच अनुक्रमाचा, भारतीय वर्णमालेवर आधारित सर्व लिप्यांसाठी एकच व शिकायला अत्यंत सोपा. तिसरा प्रकार इंग्रजी स्पेलिंग वापरून देवनागरी लिहिणे -- ज्याला पुढे रोमनागरी, फोनेटीक, युनिकोड अशी कित्येक चुकीची नावे चिकटली. हे सॉफ्टवेअर तयार करणे इतकेच नव्हे तर बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स) या संस्थेकडे खेटे घालून त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारचा की-बोर्ट लेआउट तसेच त्याचे स्टोरेज कोड  हेच इंडियन स्टॅण्डर्ड असेल ही मान्यता मिळवून घेणे (१९९१) हा माझ्या मते सीडॅकच्या वाटचालीतील सर्वात मोठा  मानाचा तुरा होता. यामधे त्यांनी पार तिबेटी लिपीपर्यंत मजल मारली होती व इतर एशियन लिप्याही लिहिता  येतील असे काम चालू केले होते. एकदा हे स्टॅण्डर्ड मान्य झाल्यामुळे हेच वापरले असते व अत्यल्प किमतीत विकले असते तर इतर सर्व कंपन्यांनीही हेच स्टॅण्डर्ड वापरले असते कारण कालांतराने पहिल्या प्रकारचा लेआऊट बाद होणारच होता व बीआयएस मान्यतेनंतर कॉपीराइटचा प्रश्न उरत नाही त्यामुळे सर्व कंपन्यांनी दुसरा प्रकार लगेच वापराच आणला असता. अशा तऱ्हेने हा एकीकरणाचा टप्पा ओलांडून सर्व कंपन्या पुढील संशोधनाकडे वळल्या असत्या. 

पण  बीआयएसच्या मान्यतेनंतर लगेचच काही चक्र फिरली. सी-डॅक ने दुस-या ऐवजी तिस-या लेआऊटला सर्वतोपरी पुढे आणले आणि प्रादेशिक भाषांचे आतोनात नुकसान चालवले ते आजतागायत. क्वचित जिथे त्यांना दुसऱ्या प्रकारचा लेआऊट विकावा लागत होता तिथेही वेगळे  स्टोरेज कोड बनवून, ते गुप्त ठेऊन, मोठ्या किमतीला विकण्याचे धोरण ठेवले. सर्वच कंपन्या आपापल्या सॉफ्टवेअरच्या विक्रीसाठी एकमेकांशी स्पर्धा करत राहिल्या व त्यातच सीडॅकसकट सर्वांचे प्रयत्न खर्च होत राहिले. कमी किंमतीत (किंवा बिनखर्चाचे) भारतीय लिप्यांचे सॉफ्टवेअर मिळण्याची शक्यता दुरावली. १९९५ मधे ईंटरनेटची सुरुवात झाल्यावर ही सर्व सॉफ्टवेअर्स युनीकोड विसंगत असल्याने इंटरनेटवर जंक होऊ लागली. मात्र रोमनागरी फळफळत राहिली. देशाच्या सुदैवाने लीनक्स ऑपरेटींग प्रणालीने व युनीकोड कन्सोर्शियमने १९९६ मधे बीआयएस स्टॅण्डर्डला व इन्स्क्रिप्ट की-बोर्डला आधारभूत धरुन इंटरनेट-कम्पॅटिबल सॉफ्टवेअर उपलब्ध करून  दिल्यामुळे आणि त्यांच्या तुलनेत आपण भारतीय बाजार गमवायला नको हे भान ठेऊन मायक्रोसॉफ्टने देखील देवनागरी लिपीसाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड सकट युनिकोड-कम्पॅटीबल असा मंगल फॉण्ट आणल्यामुळे (2001) ही सोपी पद्धत अस्तित्वात राहिली

ज्यांच्यापर्यंत ही सोय असल्याचे  ज्ञान पोचले त्यांनी संगणकावर देशी लिपींमधून लिहीण्यासाठी ही प्रणाली वापरली. अशांची संख्या अद्यापही १०-१५ टक्के एवढीच आहे. इतर ८०-९० टक्के लोकांना आजही देशी भाषा लिहीण्यासाठी रोमनचा आधार घ्यावा लागतो. याचा सर्वात मोठा फटका बसत आहे त्या विद्यार्थ्यांना ज्यांना आठवीनववीच्या आसपास शाळा सोडावी लागते. त्यांची संख्या एकूण पहीली प्रवेशाच्या ७० टक्क्याहून अधिक आहे हे लक्षात घेतले की या प्रश्नाची तीव्रता लगेच समजून येते. त्या मुलांना पुढील आयुष्यभर इंग्रजी शिका नाहीतर मागे रहा हेच एकावे लागणार आहे.

सी-डॅक ने देशी भाषांची अडवणूक अजून एका त-हेने केली आहे. त्यांनी गेल्या २५-३० वर्षात कित्येक सुंदर फॉण्ट विकसित करूनही त्याचे डिझाइन ओपन सोर्समध्ये न टाकता मालकीहक्काअंतर्गत ठेवल्यामुळे वरील सोप्या पद्धतीने देशी भाषा लिहीण्यासाठी एखाद-दुसराच फॉण्ट उपलब्ध राहतो. यामुळे प्रकाशन व्यवसायातील प्रगति मोठ्या प्रमाणांत खुंटून रहात आहे. त्या मानाने इतर देशातील भाषांमधील प्रकाशन व्यवसाय संगणकाच्या सहाय्याने वेग घेत आहे. संगणक सुविधेअभावी भारतीय भाषांचे प्रकाशन जागतिक प्रकाशनाच्या तुलनेने घटत रहाणार आहे. 

मानवाला शब्द बोलता येणे, त्यानंतर अक्षरे लिहिता येणे हे अती महत्वाचे दोन टप्पे होते. त्यामध्ये एक राष्ट्र म्हणून भारत अग्रेसर होते आणि तेही हजारो वर्षांपूर्वीपासून. साधारण त्याच तोडीचे महत्व असलेल्या संगणकावर व इंटरनेटवर भविष्यकाळातील भाषा हा विषय अवलंबून रहाणार आहे. संगणक क्षेत्रातील सर्वाधिक इंजिनीयर्सची संख्या भारतियांची असल्याचा मोठा अभिमान आपण बाळगू शकतो. पण त्यांची ही ऊर्जा आपण संगणकावर आपल्या वर्णमालेला धिक्कारून, लिप्यांचे खच्चीकरण करीत इंग्रजीच्या वाढीसाठी वापरत आहोत हे ध्यानांत ठेवले पाहीजे. आपल्या वर्णमालेविना लिप्या व भाषा विस्कळित होतील हे ओळखले पाहिजे व त्यासाठी संगणकामधील ही अत्यंत सोपी आणि तरीही दूर ठेवलेली पद्धतच आपण प्रचारात आणली पाहिजे.

असो. आता पुढील मुद्द्याकडे वळू. (अपूर्ण)


------------------



















4 comments:

Unknown said...

यात मला काही मुद्दे जाडावेसे वाटतात. c-dac सह सर्वच मराठी हिंदी संस्कृत सिंधी या सर्व भाषांची लिपी एकच असली तरी भाषा वेशिष्टियानुसार कळपलकात फरक करण्यास तयार नाहित. जसे मराठीतील 'अॅ' ह्या वर्णासाठी स्वतंत्र कळ नाही. बहुतेक य़ुरेपियन भाषा एकाच लिपीत म्हणजे लॅटिन लिपीत लिहिल्या जात असल्यातरी प्रत्येक भाषेत स्वतंत्र वर्ण आहेत. जसे की, स्पॅनिश ñ फ्रेंचé è ç à स्विडीश ö ä å आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कळ आहेत.देवनागरीत मात्र केवळ हिंदीचाच विचार केला जातो.

Unknown said...

यात मला काही मुद्दे जाडावेसे वाटतात. c-dac सह सर्वच मराठी हिंदी संस्कृत सिंधी या सर्व भाषांची लिपी एकच असली तरी भाषा वेशिष्टियानुसार कळपलकात फरक करण्यास तयार नाहित. जसे मराठीतील 'अॅ' ह्या वर्णासाठी स्वतंत्र कळ नाही. बहुतेक य़ुरेपियन भाषा एकाच लिपीत म्हणजे लॅटिन लिपीत लिहिल्या जात असल्यातरी प्रत्येक भाषेत स्वतंत्र वर्ण आहेत. जसे की, स्पॅनिश ñ फ्रेंचé è ç à स्विडीश ö ä å आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कळ आहेत.देवनागरीत मात्र केवळ हिंदीचाच विचार केला जातो.

योगेश्वर कस्तुरे said...
This comment has been removed by the author.
योगेश्वर कस्तुरे said...

पुरा लेख पढा..."भारत मे राष्ट्र की संकल्पना"...यह चिंतन मुझे भा गया!