Wednesday, June 18, 2008

हक्कांची जपणूक आणि न्यायबुद्धी.

हक्कांची जपणूक आणि न्यायबुद्धी.
- लीना मेहेंदळे, भा.प्र.से.
नुकतेच ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या परीक्षांचे निकाल लागले त्यांत पारधी समाजातून पहिल्यांदाच अधिकारी निवडले गेले. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. ग्रामीण भागातूनही चांगल्या प्रमाणात अधिकारी निवडले गेले. या अधिकार्‍यांनी आपापल्या भागाचे, जाती जमातींचे प्रश्न व दु:ख डोळयापुढे ठेऊन सचोटी व न्यायबुध्दीने काम केले तर भारतीय नोकरशाहीला एक वेगळे वळण मिळू शकेल. महात्मा गांधी म्हणत त्याप्रमाणे खेडोपाडीचा भारत काय आहे हे समजून घेतले तरच देशाची प्रगती होऊ शकेल. यासाठीच जेंव्हा खेड्यापाड्यांतील मुली-मुले प्रशासनात येतात तेंव्हा त्यांचे स्वागतच करायला हवे.
माझा जन्म खेडगांवातला - खान्देशातील धरणगांवचा. ते धाब्याच ऐसपैस घर, आजोबांची लाकडाची वखार, तिथले गल्ल्या, रस्ते, मंदिर, आठवडा बाजार, धरण, शेत - सगळ आजही एवढ स्वच्छ आहे की अंधारात डोळे मिटून मी कूठूनही कुठेही जाऊ शकते. शाळा कॉलेजचं शिक्षण मात्र लांब बिहारच्या दरभंगा या गांवात. हे जिल्ह्याचं ठिकाण असल तरी विचारसरणी जुनाटच होती. मुलींसाठी वेगळी शाळा - शाळेची जुनी पुराणी बस. ती किंवा ड्रायव्हर बिघडले की शाळेला सुट्टी कारण मुली पायी पायी शाळेत कशा जाणार? सुदैवाने ग्रॅज्युएट पालक म्हणून आई शाळेच्या पालक कमिटीवर आली आणि तिने आग्रह धरला की मुलींना पायी किंवा रिक्शाने शाळेत येऊ द्या. मग ती खटारा बसही विकून टाकली गेली आणि एका मानसिक कैदेतून मुली - शिक्षक, पालक आणि शाळा चालक सगळ्यांचीच सुटका झाली. तेंव्हा वडीलांनी एक धाडसी निर्णय घेऊन टाकला - मला सायकल घेऊन दिली - शाळेत, कॉलेजात मी सायकल ने जात राहिले. आठवी ते बी एस्सी - मी सायकल वरून जावं आणि लोकांना रस्त्यांत “छोरी साइकिल चलावै छे” अस म्हणत माझ्याकडे बघत उभ रहावं याची खूप सवय झाली. पहाणा-यांच्या नजरेत आश्चर्य असे - बायका असल्या तर आनंद असे पण चेष्टा मस्करी नव्हती. आपल्याकडे बिहारी कल्चर बद्दल निष्कारणच खूप गैरसमज आहेत. मात्र हे ही खरे की माझ्यानंतरची पुढली सायकल चालवणारी मुलगी तब्बल पंधरा वर्षांनी आली - माझीच सायकल वापरून.
त्या सायकलने मला एक शिकवल - हातात वेग असेल तर आपला आत्मविश्र्वास वाढतो. खूप खूप वर्षानंतर तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी फतवा काढला - सरकारी नोकरीतील सर्व स्त्रियांना मोफत सायकल देण्याचा - आणि मी राष्ट्रीय महिला आयोगात होते तेंव्हा एका अभ्यासात असे दिसले की या सायकल वाटपानंतर पुढील पाच - दहा वर्ष तामिळनाडुमधली महीलांवरील अत्याचाराची टक्केवारी कमी झाली होती. आजतर स्त्रियांचे सवलीकरण आणि शिवाय पर्यावरण रक्षणासाठी आपण सायकलकडे वळणे गरजेचे आहे.
शाळेत मी हुषार विद्यार्थिनी होते. पुस्तकातल्या धड्यांमुळे तसेच शिक्षकांच्या शिकवण्यामुळे राणा प्रताप, शिवाजी, विवेकानंद, लोकमान्य, सुभाषचंद्र बोस, एवरेस्ट सर करणारा शेरपा तेनसिंग, नर्सिंग व्यवसायांत वेगळे कौशल्य आणि सेवाभाव आणणारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल आणि सर्व क्रांतिकारक हे माझे आयडॉल्स होते. अभ्यासात सर्वच विषयांची गोडी होती. पण भौतिक शास्त्राची गोष्ट वेगळीच होती. मला आठवतात पहिले दोन प्रयोग - पहिल्यांत फुटपट्टीच्या सहाय्याने लाकडी ठोकळ्याची लांबी मोजतांना पट्टीवरील दोन रेषांच्या मधे ठोकळ्याची कडा येत असेल तर अनुमानाने तीन दशांश का सहा दशांश ते लिहायला शिकवल गेल. फूटपट्टीवर आपण मिलीमीटर पर्यंत अंतर मोजू शकतो. पण त्याहून छोटे अंतर अनुमानाने न मोजता काटेकोर मोजायचे असेल तर कांय? या साठी दुसरा प्रयोग व्हर्नियर कॅलिपर्सचा होता. यामधे दोन पट्टया असतात. एकीवर दहा मिलीमीटर च्या दहा रेषा असतात, पण दुसरीवर नऊ मिलीमीटर अंतराला दहा सम भागात वाटून त्यावर दहा खुणा केलेल्या असतात. त्यामुळे दोन पट्टयांच्या मधे एखादा ठोकळा अडकवल्यावर दुस-या पट्टीची चौथी रेघ पहिल्या पट्टीच्या एखाद्या रेघशी जुळत असेल तर ते काटेकोर मोजमाप चार दशांश मिलीमीटरचे असेल. थोडक्यांत दोन पट्टयांच्या स्केल मधे फरक निर्माण करून आपण एक मिलीमीटरहून छोटे अंतर मोजण्याची युक्ति निर्माण केली. या युक्तिचे मला एवढे अप्रूप वाटले की भौतिक शास्त्र म्हणजे विचार करायला शिकवणारे शास्त्र असे माझे समीकरण बनले. भौतिक शास्त्रातील पुढच्या अभ्यासाने (उदा. आर्किमिडीसचा पाण्यांत उतरल्यावर हलकं कां वाटत हा सिध्दान्त) हे समीकरण वारंवार पक्के होत गेले.
नला लहानपणापासून खरेपणाइतकेच न्यायप्रियतेचेही मोल वाटू लागले. महाभारतातील यक्ष प्रश्न या आख्यानात यक्षाच्या प्रश्नांना उत्तर न देताच तलावाचे पाणी घेण्याचा प्रयत्न करणारे भीम अर्जुन नकुल सहदेव मरून पडतात. युधिष्ठिर तिथे पोचतो. यक्षाने अडवल्यावर तो थांबतो आणि त्याच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देतो. तेंव्हा यक्ष प्रसन्न होऊन म्हणतो – चल, मी इतका खूष आहे की तू पाणी तर घेच, पण तुझ्या एका भावालाही जिवंत करतो. सांग कुणाला करू ? युधिष्ठिर म्हणतो नकुलाला कर. यक्ष आश्चर्याने विचारतो - भीम - अर्जुन कां नाहीत ? ते नसतील तर तुझे गमावलेले राज्यही मिळणार नाही. इथे आपल्याला युधिष्ठिराची न्यायबुद्घी दिसून येते. तो म्हणतो मला राज्याची पर्वा नाही. माझ्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या. त्यापैकी मी - कुंतीपुत्र जिवंत आहे. आता जर एकच भाऊ जिवंत होऊ शकत असेल तर तो माद्रीपुत्र असावा, म्हणजे माझ्या दोन्हीं आयांचा एक एक मुलगा जगेल. यावर अतिप्रसन्न होऊन यक्ष चारही भावांना जिवंत करतो. तुम्ही न्यायबुद्घी दाखवाल तर त्याचे चांगले फळ तत्काळ मिळू शकते. स्वतः केलेली कामे देखील या न्यायबुद्धीच्या तराजूतच तोलली पाहिजेत.
माझ्या नोकरीची सुरुवात आणि मध्य एवढया वर्षाच्या कालावधीत देशाची संपूर्ण आर्थिक विचार प्रणालीच झपाटयाने बदलत होती. पंडित नेहरुंच्या काळात समाजवादी लोकशाहीची संकल्पना रुजली होती. त्यामध्ये कित्येक उद्योगधंदे शासनानेच सुरु करण्याचे धोरण असल्याने पब्लिक सेक्टरची झपाटयाने वाढ झाली. दुसरे धोरण देशांतर्गत उद्योगधंदे वाढीचे होते. त्यासाठी पूरक धोरण असेही होते की देशांतील कच्चा माल देशभरातील सर्व उद्योजकांना उपलब्ध व्हावा. यासाठी कच्च्या मालाचे उत्पादन सरकारी क्षेत्रांच्या मक्तेदारीत राहिले व सरकारी अधिका-यांकडे उद्योगधंद्यांचे लायसेन्स, कच्च्या मालाचा कोटा इत्यादी देण्याचे अधिकार आले. अशा या लायसेन्स राज्यांत काही सरकारी व पब्लिक सेक्टर कंपन्यांनी खूप चांगली कामगिरी करुन दाखवली. पण हळूहळू मोनोपोलीमुळे येणारा उर्मटपणा, आळस, बेदरकारी, बेपर्वा वृत्ती हे अवगुण पण पुढे येऊ लागले. अकौंटेबिलिटीची वाट लागली. आणि मग अचानक प्रायव्हेट सेक्टरचे गोडवे गायले जाऊ लागले. देश जणू लंबकाच्या एका टोकावर होता तो झपाटयाच्या वेगाने फिरला आणि दुस-या टोकावर गेला. या संक्रमणात फक्त आर्थिक धोरणच दुस-या टोकावर नाही गेले तर नैतिकतेचे कित्येक संकेतही उलटे पालटे झाले. आणि आता तर ‘दाग अच्छे हैं’, किंवा ‘जॉब्स युवर पेरेंट्स डोन्ट अंडरस्टॅण्ड’ हे संस्कृतीचे परवलीचे शब्द मानले जाऊ लागले आहेत. हे जे समाजात घडले तेच राजकारणात आणि प्रशासनांतही घडले आहे.
या संक्रमणाची आखणी विचारपूवर्क केली होती असेही नाही. यामुळे देशांतील पूर्वी न सुटलेले प्रश्न तसेच राहिले. लोकसंख्या वाढीचा प्रश्न, अशिक्षण, गरीबी, बेकारी, बालमजुरी, खेडयांकडून शहराकडे पलायन, कृषी क्षेत्राची दुरवस्था --- वाईट सीझन मध्ये तसे नुकसान आणि चांगल्या सीझनमध्ये भाव पडल्याने नुकसान -- फसलेले पुनर्वसन आणि त्यांतच पाणी धोरणाचे अपयश, हे सर्वच मुद्दे तसेच राहिले. स्त्रीभ्रूण हत्ये सारखे नवे प्रश्न निर्माण झाले. मात्र अवकाश - विज्ञान, सागरी विज्ञान, धरणे रस्ते व काही ठराविक प्रांतांनी उद्योग क्षेत्रात केलेली प्रगती ही जमेची बाजू म्हणता येईल. सस्टेनेबिलिटीचा मुद्दा मात्र पार विसरला गेला. यशदा येथे माझे पोस्टिंग ऍडिशनल डायरेक्टर व प्रोफेसर रूरल डेव्हलपमेंट आशी होती. त्या वेळी प्रशिक्षणार्थींना शिकवतांना मी या मुद्यावर भर देत असे.
नव्वदीच्या दशकांत संगणक आले आणि पुढल्या कित्येक - पोस्टवर मी कार्यालयांत संगणक कल्चर आणण्याचे काम प्राथम्याने केले. संगणकातल्या कित्येक युक्त्या शिकून घेतल्या - इतरांना शिकवल्या. त्याचा उपयोग जसा कार्यालयात धाला तसाच स्वतःची वेबसाइट, ब्लॉगसाइट इत्यादी करण्यासाठी पण झाला. बव्हंशी युक्त्या माझ्या मुलांनी मला शिकवल्या आणि आम्हीच कसे गुरू म्हणत आईचा गुरू होण्याची हौस भागवून घेतली. (तू रोज पाढे म्हणून घेतेस - या गोड तक्रारीचा वचपा). तसेच मुलांच्या हक्कासंबंधात त्यांचा आग्रही दृष्टिकोण होता की मुलांच्या मताचा योग्य आदर झालाच पाहिजे. मोठ्या माणसांनी त्यांच्या मताची वकिली करावी किंवा करू नये पण त्यांचा सम्मान मात्र जरूर राखावा. आम्हीही याची कदर केली. आता असे जाणवते की लहानपणी माझ्या आईवडिलांनी देखील आम्हां मुलांच्या मतांची कदर ठेवली होती. नुकताच माझ्याकडे बालहक्क संरक्षण आयोगाचे अतिरिक्त काम देण्यांत आले तेंव्हां मुलांनी पुन्हां आपल्या मुद्याची आठवण करून दिली.
मला केंद्र शासनाकडे मिळालेली पोस्टिंग - नॅचरोपथीची डायरेक्टर, राष्ट्रीय महिला आयोगात संयुक्त सचिव व पेट्रोलियम कन्झर्व्हेशन साठी एक्झीक्यूटिव्ह डायरेक्टर - या तीनही कामांनी मला दिल्लीचे एक्सपोजर तर दिलेच पण खूप वेगळे विषय हाताळतांना त्यांच्या मूळ समस्येपर्यंत जाऊन कस भिडायच ते ही शिकवल. पीसीआरए साठी आकाशवाणीवर “ बूंद बूंद की बात ” कार्यक्रमाचे अडीचशे एपिसोड तर दूरदर्शन वर “ खेल खेल मे बदलो दुनिया ” या कार्यक्रमाचे दोनशे एपिसोड आम्ही केले. त्यातून माझी एक आवडता सिद्घान्त पारखून घेण्याची संधी मिळाली. या दोन्ही माध्यमांचा वापर आनंददायी शिक्षण आणि व्यवसाय शिक्षणासाठी करता येतो आणि करायलाच हवा ही माझी थियरी. तिला भरघोस यश मिळाले. एक दिवस इंटरनेट सर्फिंगमध्ये एका पानवर कॉलेज विद्यार्थ्याचे प्राचार्यांना पत्र वाचायला मिळाले “पीसीआरएचा कार्यक्रम पाहून मी व माझ्या मित्रांनी आपल्या कॉलेजात एनर्जी कन्झर्व्हेशन क्लब स्थापन करायचे ठरवले आहे” - वगैरे. तर एक दिवस आम्ही भोपाळच्या सोयाबीन इन्स्टिटयूटवर दाखवलेला प्रोग्राम पाहून बिहारचा एक तरुण आला - आमच्या मदतीने त्या इन्स्टिटयूटमध्ये महिन्याचे प्रशिक्षण घेतले, स्वत:चा कारखाना काढला आणि एक दिवस नफ्यांत असलेला बॅलेन्स -- शीट घेऊन दाखवायला आला. पण दूरदर्शनचे हे सामर्थ्य अजून दूरदर्शननेही ओळखलेले नाही. मला अजूनही असे वाटते की आत्महत्येपासून शेतकर्‍यांना परावृत्त करण्यासाठी शासनाला दूरदर्शनचा प्रभावी उपयोग करुन घेता येईल.
महिला आयोगांत असतांना महिलांचे किती म्हणून प्रश्न समोर यावेत ? त्यांना मिळणारी दुटप्पी वागणूक, महिलांच्या तक्रारींच्या निमित्ताने वारंवार जाणवली. सर्व प्रयत्न केले जातात स्त्रीला पुढे न येऊ देण्याचे, तिला हक्क न मिळू देण्याचे - तिला सत्तेत वाटेकरी न होऊ देण्याचे देशाचे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट GDP मोजतांना डोमेस्टिक महिलांच्या - म्हणजे गृहिणींच्या सर्व श्रमांची किंमत शुन्य एवढीच मोजली जाते. त्यांना जमीन नाही, घर नाही, शिक्षण नाही, पोषण नाही, आधार नाही, सुरक्षा नाही, सन्मान नाही, माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही --- इतकच नव्हे तर माणूस म्हणून जन्म घेण्याचाही हक्क नाही. महिलांविरुध्द होणार्‍या अत्याचारांचा विशेष अभ्यास मी 2000-01 या काळात केला. त्यांत बलात्काराचा प्रश्न आहे. हुंडाबळींचा आहे. जाळून मारल्या जाणार्‍या इतक्या स्त्रिया असतांनाही जळालेल्या स्त्रीला त्वरित प्रभावी उपचार -- देण्यासाठी स्पेशल वार्ड असलेले एकही हॉस्पिटल आपल्या देशात नाही. मुलींचा गर्भ पाडला नाही म्हणून पोटावर लाथा - बुक्क्या खाल्लेल्या स्त्रियाही मी पाहिल्या आहेत. तर डायन असा ठपका लावून गावातून निर्वस्त्र धिंड काढलेल्या स्त्रियांचे अश्रूही पाहिले आहेत. दहा - बारा वर्षानंतर बलात्काराची केस चालवतांना त्या स्त्रियांचे दु:ख साक्षीत दिसून आले नाही, म्हणून आरोपींवर गुन्हा शाबीत होत नाही, अस म्हणणारी आपली एकंदर न्याय व्यवस्था पाहिली तेव्हा वाटल - आपल बोट काल कापल तर आजच त्याच्या दु:खाची तीव्रता कमी होते - आपल्याला जगता यावा म्हणून आपल्या मेंदूत निसर्गानेच तशी सोय केली असते. मग दहा वर्षापूर्वीच्या दु:खाची, जखमांची आणि अपमानाची तीव्रता आजही तितक्याच वेदनेसह व्यक्त करण्याची शिक्षा त्या मुलींना कां? उशीर करायचा शासन यंत्रणेने आणि छळ करुन घ्यायचा त्या मुलींनी ? कां नाही दहा दिवसाच्या आंत तिची साक्ष नोंदवून ठेवता येत ? तिच्यावर झालेल्या गंभीर जखमांचे वर्णन देऊन शेवटी डॉक्टर्स अत्यंत कातडी बचावू निष्कर्ष काढतात --- बलात्कार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या डॉक्टरांचे प्रशिक्षण कोण करणार ? निव्वळ निर्वाह -- भत्ता मिळावा म्हणून वर्षानुवर्ष कोर्टाच्या चकरा मारणार्‍या महिलांच्या चकरा कमी करण्यासाठी ज्युडिशिअल रिफॉर्मस कोण आणणार ?
वी हॅव माइल्स ऍण्ड माइल्स ऍण्ड माइल्स टू गो, तेव्हा नेटाने पावले टाकत रहाणे हे तरी आपल्या हातात असतेच ना !
----------------------------------------------------------------------
मटा. दि. 22 जून 2008
Read here-- आगे पढें
वेब 16 वर मंगल व pdf file.

No comments: